22 August 2014

कबड्डी कबड्डी


मला स्पोर्ट्स पाहण्याची फारशी आवड नाही. आणि तसंही भारतात क्रिकेट शिवाय इतर खेळ फारसे पहिलेही जात नाहीत. क्रिकेट वर माझे फार प्रेम नाही (तसा फार रागही नाही).. कधीतरी वर्ल्ड कप वगैरे सुरु असेल तर एखादी मैच पाहते.. पण एरवी मी काही भारतीय 'क्रिकेट' धर्माची उपासक नाही.. लहानपणी टेनिसच्या मैच पहिल्या होत्या.. पण त्याही कधीतरीच.. थोडक्यात काय तर TVवर स्पोर्ट्स पाहण्याची वेळ विरळाच..

पण असं असतानाही मला सध्या एक नवीन छंद जडला आहे.. तो म्हणजे कबड्डीच्या मैच बघण्याचा.. त्याचं काय झालं.. गेल्या महिन्यात माझ्या एका भावाला घरी जेवायला बोलावलं होतं.. त्याने घरी आल्या आल्या स्टार गोल्ड लावायला सांगितलं.. पाहिलं तर 'प्रो-कबड्डी' नावाने कबड्डीचा खेळ मांडला होता (अगदी क्रिकेटच्या IPL सारखाच).. त्यादिवशी जयपूर आणि मुंबई या टीम्सची मैच होती.. आम्ही भावाबरोबर ती मैच एन्जॉय केली.. आणि त्या दिवसापासून तो रोज संध्याकाळचा कार्यक्रम झाला..

मी लहानपणी जे खेळ खूप आवडीने खेळले आहेत, त्यापैकी कबड्डी हा एक खेळ आहे (दुसरे म्हणजे लगोरी आणि खोखो).. या रोमांचक खेळाची आठवण आली तरी अंगावर काटा येतो.. दुसऱ्यावर आक्रमण केल्यावर जास्तीत जास्त जणांना बाद करून शिताफीनं परतायचं आणि दुसऱ्याने आपल्यावर आक्रमण केलं की काही करून त्याला पकडायचं.. यात वेगळीच मजा असते.. आपल्यापैकी जवळजवळ सगळ्यांनीच हा खेळ लहानपणी खेळलेला असतो.. मात्र काळाच्या ओघात त्याचा विसर पडत जातो..

मागे माझ्या पोलिटिक्स च्या सरांशी चर्चा करत होते.. की क्रिकेट आणि पारंपारिक भारतीय खेळ ह्यात काय फरक आहे.. ते म्हणाले, खोखो, कबड्डी, लगोरी ह्या भारतीय खेळांत सहखेळाडूंना स्पर्श करावा लागतो.. आणि त्यातून एकमेकांबद्दल आपुलकी वाढते.. भारतीय माणूस हा मुळातच समाजशील आहे.. ह्याउलट ब्रिटीश लोक व्यक्तीस्वातंत्रवादी आहेत.. त्यामुळे त्यांचा खेळ म्हणजेच क्रिकेट सगळे एकमेकांपासून लांब उभे राहून खेळतात.. मजेशीर मुद्दा आहे.. पण पटण्यासारखा आहे.. ज्यांच्या खांद्याला खांदा लावून आपण हे खेळ खेळलो आहोत, त्या बालसवंगड्याबद्दल एक वेगळाच जिव्हाळा आपल्या मनात असतो.. असो.. 'प्रो-कबड्डी'च्या निमित्ताने ह्या सगळ्या गतकाळातील आठवणींना उजाळा मिळाला..

भारतात विविध खेळांत प्राविण्य मिळवलेले अनेक खेळाडू आहेत.. ज्यांची आपल्याला साधी नावंही माहित नसतात.. क्रिकेट खेळणाऱ्यांची मात्र गरजेपेक्षा जास्त माहिती आपल्याकडे असते (काही स्पोर्ट्स पेज आणि काही पेज ३ च्या माध्यमातून मिळालेली.. असो..).. 'प्रो-कबड्डी'च्या निमित्ताने अनेक कबड्डीपटूंशी ओळख झाली.. प्रत्येकाचे मूळ गाव कुठले येथपासून त्यांना कुठले पुरस्कार मिळाले आहेत, ह्याचीही माहिती झाली.. प्रत्येकाच्या विशेष खुबी कळल्या.. भारतीय कबड्डी संघाचा कर्णधार राकेश कुमार कितीही जणांनी धरलं तरी जमिनीच्या आधाराने कसा निसटतो ते पाहिलं.. तसंच कितीही कठीण परिस्थिती असेल तरी संयमाने आणि शांतपणे गुण कमावणारा उप-कर्णधार अनुप कुमार पाहिला.. तसंच हिमाचलच्या अजय ठाकूरची वेगळीच आक्रमक शैली पहिली.. 

खूप खडतर परिस्थितीतून ही मंडळी पुढे आली आहेत.. भारताच्या संघात असून, आजपर्यंत अनेक पुरस्कार मिळवूनही हे सगळे अतिशय साधे आणि विनयशील आहेत.. ह्याचे कौतुक वाटते.. ह्या व अशा प्रकाशझोतात न आलेल्या सगळ्यांनाच ह्या निमित्ताने सलाम करावासा वाटतो.. स्टार स्पोर्ट्सने ही अद्भुत दुनिया आपणां समोर आणली, हे बरेच झाले.. ह्या हरहुन्नरी खेळाडूंपासून प्रेरणा घेऊन नवीन खेळाडू तयार होतील, असा विश्वास वाटतो.. 

17 May 2014

मोदींना महिलांचा पाठींबा का?



श्री. नरेंद्र मोदी लवकरच भारताच्या पंतप्रधानपदी विराजमान होणार आहेत. २०१४च्या लोकसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर आता पंतप्रधानपदाचा शपथविधी ही केवळ एक औपचारिकता आहे. ह्या निवडणुकीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे श्री. नरेंद्र मोदींना समाजातील सर्व घटकांतून निर्णायक पाठींबा मिळाला. युवकांनी ज्याप्रमाणे मोदींना उचलून धरले, त्याचप्रमाणे भारतीय महिलांनीही त्यांना मोठ्या प्रमाणात साथ दिली. महिलांना मोदींच्या नेतृत्वाचे आकर्षण का वाटले, याचे विश्लेषण मी ह्या लेखात करत आहे.

भारतीय महिलांविषयी नेहेमीच बोलले जाते की त्यांना राजकीय समज नाही. आपले पती सांगतील त्या उमेदवाराला त्या मत देतात. तसेच भारतीय महिला सोशिक असतात. सामाजिक समस्यांविरुद्ध आंदोलन करण्याऐवजी त्या समस्यांना अंगवळणी पाडून घेतात. येईल त्या परिस्थितीला शांतपणे तोंड देत राहतात. मात्र ह्या मताला ह्यापूर्वीही भारतीय महिलांनी अनेकदा खोटे ठरवले आहे. बदलाची आणि प्रगतीची आस धरणाऱ्या भारतीय महिला अनेकदा भारतीय राजकारणात निर्णायक ठरल्या आहेत. तसेच ह्यावेळी घडले.

मुळात महिलांचा राजकारणाशी खूप जवळचा संबंध असतो (कळत नकळत). त्यांचे रोजचे जीवन राजकारणाने प्रभावित होत असते. विजेचा तुटवडा, पाण्याचा अशुद्ध व अपुरा पुरवठा, अन्नधान्ये आणि भाज्यांच्या वाढत्या किमती, शौचालयांची अनुपस्थिती, सांडपाण्याचा दोषपूर्ण निचरा ह्या महिलांना थेट भिडणाऱ्या समस्या आहेत. तसेच भारतातील मुलींच्या शिक्षणाविषयी अनास्था, माता आणि मुलांच्या आरोग्याची हेळसांड, आणि महिलांसाठी घातक रुढींचा पगडा, ह्यामुळे महिला त्रस्त असतात. अशा परिस्थितीत महिलांनी स्थानीय ते राष्ट्रीय राजकारणात वाढता सहभाग घेणे त्यांच्याच हिताचे आहे, जेणेकरून त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यात त्यांचा मोठा वाटा असेल.

स्वातंत्र्यानंतरच्या काळात भारतीय महिला मोठ्या प्रमाणावर काँग्रेसच्या पाठी उभ्या राहिलेल्या दिसल्या आहेत. काँग्रेसची सर्वसामान्यांविषयीची धोरणे त्यांना आपलीशी वाटली. त्यातून आपला विकास होईल, असे त्यांना मनोमन वाटले. मात्र विकासाकडे डोळे लावून बसलेल्या भारतीय महिलांना काँग्रेसने तो विकास बहाल केलाच नाही. अशा हताश परिस्थितीतच त्यांना मोदींच्या रूपाने एक आश्वस्त दिलासा मिळाला.

मोदींचे विनयशील तरीही आश्वासक व्यक्तिमत्व, त्यांची समाजमनाची समज, देशाविषयी निष्ठा आणि सुधारणेची तळमळ ह्यामुळे भारतीय महिला मुळातच त्यांच्या नेतृत्वाकडे आकर्षित झाल्या. तसेच मोदींनी केलेला गुजरातचा कायापालट घरा-घरात दूरदर्शन, वर्तमानपत्र यातून पोहोचला. गुजरातमधील २४ तास वीज, कछच्या रणातही पाण्याचा मुबलक पुरवठा, महिलांच्या शिक्षणातील प्रगती, स्त्रीभ्रूण हत्येचा नायनाट, आरोग्यविषयक सुधारणा ह्यामुळे जग अवाक झाले. त्याने भारतातील इतर भागात राहणाऱ्या महिलांच्या मनात आशेचा किरण चमकला. असेच सुखी, समाधानी जीवन आपल्याला हवे असे त्यांना न वाटते तरच नवल! मोदींच्या भाषणांमधून त्यांनी महिला समस्यांना वाचा फोडली. महिला आरोग्य, शिक्षण आणि जीवनस्तर ह्यावर भरपूर भाष्य केले. समस्यांनी पिचलेल्या महिलांना नवीन स्वप्ने दाखवली. ह्यामुळे महिलांचा पाठींबा मोदींकडे वळला.

महिलांच्या मोदी पाठिंब्याला अजून २ कारणे महत्त्वाची ठरली. एक म्हणजे, निवडणुकीत महिला उमेदवारांना खूप प्रोत्साहन दिले गेले. अगदी स्मृती इराणी, उमा भारतींपासून प्रथम उमेदवार मीनाक्षी लेखी, पूनम महाजन, हीना गावित पर्यंत सर्वांनी प्रचारात भाग घेतला. त्यांच्या चेहेऱ्यांतून महिला सबलीकरणाचे प्रतिबिंब दिसले. दुसरे कारण म्हणजे, महिला सुरक्षेचा दिवसेंदिवस गंभीर झालेला प्रश्न. ह्या प्रश्नावर उपाय करण्यासाठी देशाला एका संवेदनशील तरीही सक्षम सरकारची गरज होती. ते दोन्ही गुण फक्त मोदींमध्येच दिसले.

काँग्रेसने मोदींची छबी मलिन करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला. त्यांच्या भूतकाळातील विवाहाची चर्चा, जशोदाबेनविषयी खोटे गळे काढणे, महिलेच्या हेरखोरीची अतिरंजित कहाणी, आणि एकंदरच मोदींची 'पुरुषप्रधान' छबी रंगवण्याचा खूप प्रयत्न झाला. डाव्यांनी आणि तथाकथित 'मानवाधिकार' वाल्यांनी तर कहरच केला. पण भारतीय महिला कुठल्याच टीकेने विचलित झाल्या नाहीत. त्यांनी मोदींना पाठींबा देण्याचा निर्णय पूर्णत्वाला नेला. प्रसंगी पतीच्या, घरच्यांच्या सल्ल्यांना डावलून त्यांनी मोदींना भरभरून मतदान केले.

आपले जीवनमान उंचावेल ह्या भाबड्या आशेने भारतीय महिला मोदींच्या मागे उभ्या राहिल्या. त्यांच्या आशेला भविष्यात मोदी कसे पूर्णत्वाला नेतात याविषयी आता उत्सुकता आहे.

14 April 2014

जशोदाबेन

सध्या सार्वत्रिक निवडणुकांचे दिवस सुरु आहेत. वृत्तवाहिन्यांचे कार्यक्रम आणि वृत्तपत्रांचे रकाने निवडणुकीच्या बातम्यांनी भरभरून येत आहेत. हल्ली काही राजकारण्यांनी राजकारणाची पातळी अतिशय खाली आणून ठेवली आहे. अशा राजकारण्यांनी सैनिकांच्या साहसाची गटबाजी केली, निघ्रूण बलात्काऱ्यांच्या बाजूने गळेही काढले. नेतेमंडळीना तर हल्ली एकमेकांवर अश्लाघ्य चिखलफेक करण्यातच धन्यता वाटत असते; आणि वृत्तवाहिन्यांना ही सगळी चिखलफेक परतपरत उगाळत बसण्यात! अशा परिस्थितीत संवेदनशील व्यक्ती काही भाष्य करूच शकत नाही. सुन्न होऊन बघत बसण्याशिवाय काही पर्याय उरत नाही.

तशीच सुन्न-शांत बसून होते. काही बोला-लिहायचीही इच्छा होत नव्हती. पण "ती"ची व्यथा ऐकली. आणि हा संयमाचा बांध फुटला. बोलावं, लिहावं अगदी आक्रस्ताळेपणाने ओरडावं वाटू लागलं. "ती"च्या बाजूने उभं राहावं, सर्वांसमोर जाऊन "ती"ची बाजू मांडवी, असं वाटू लागलं. 

तसं पाहता "ती" अगदी सामन्यांतलीच एक. खेडेगावात, गरीब घरात जन्मलेली. जुन्या वळणाच्या कुटुंबात वाढलेली. ७वी पर्यंत जेमतेम शिक्षण पार केलं, तेव्हाच वडिलांनी "ती"चं लग्न लावून दिलं. अगदी लग्न म्हणजे काय हे कळायच्या आधी "ती" सासरी नांदायला गेली सुद्धा. नवऱ्याशी काही जवळीक होण्याची शक्यताच नव्हती. कारण नवऱ्याच्या मनात राष्ट्रप्रेमाचेच वारे वाहत होते. भारतमातेच्या चरणी लीन होऊ इच्छिणाऱ्या 'त्या'च्या साठी लग्न, बंधन, पत्नी ह्या दुरापास्त गोष्टी होत्या. त्यात अडकून न पडता त्याने त्याचा मार्ग निवडला. तो निघून गेला, तो परत मागे वळून पाहण्यासाठी नाहीच.

जाताजाता "ती"ला एकच संदेश देऊन गेला, 'वडिलांकडे जाऊन तुझे राहिलेले शिक्षण पूर्ण कर'. "ती" देखील नवऱ्याने सांगितलेल्या मार्गाने जाऊ लागली. शिकली-सवरली. शाळेत लहान मुलांना शिकवू लागली. भावांच्या आश्रयाला राहिलेल्या "ती"ने परत दुसऱ्या लग्नाचा कधी विचारच केला नाही. शाळेतील मुलांच्या शिक्षणातच स्वतःला झोकून दिलं. रोज शाळेची नोकरी, दैनंदिन घरकाम, पूजापाठ यातच "ती"ने संपूर्ण आयुष्य व्यतीत केलं. संपूर्ण एकटेपणाचा प्रवास! आपला निघून गेलेला नवरा परत कधीही आपल्या जवळ येणार नाही, आपल्याशी कुठला संपर्कही करणार नाही, याची "ती"ला मनोमन कल्पना होती. "ती"ने तशी आशा देखील कधी बाळगली नाही.

"ती"चा नवरा कैक वर्ष संघ-प्रचारक म्हणून भारतभर फिरला. आतोनात श्रम केले. समाजाचे, राष्ट्राचे कल्याण करण्यासाठी झटला. पुढे राजकारणात सक्रिय झाला. एका मोठ्या राज्याचा मुख्यमंत्री झाला. आणि त्या राज्यात केलेल्या कल्याणकारी कार्यामुळे देशभर प्रसिद्धीस आला. आणि आता 'तो'च भारताचा पंतप्रधान होण्याच्या जवळ पोहोचला आहे.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे या संपूर्ण प्रवासात 'त्या'ला कधीही बायकोची आठवण आली नाही. पण 'त्या'ची उणीदुणी काढणाऱ्या 'त्या'च्या विरोधकांना मात्र "ती"ची आठवण आली. आणि मग "ती"च्या अस्तित्वाचा शोध घेण्याची कुत्सित चढाओढ विरोधक आणि वृत्तसंस्था यांच्यात लागली. 'त्या'ने "ती"ला कसे त्यागले, "ती"ची कशी अवहेलना झाली, "ती"ने कसे एकटेपणात, हलाखीत आयुष्य व्यतीत केले, अशा कथांना उधाण आले. एवढेच नाही, तर "ते" दोघे किती दिवस एकत्र राहिले, त्यांच्यातील संबंध कसे होते, त्यांच्यात शारीरिक संबंध प्रस्थापित झाले होते का, त्यांचे एकमेकांशी बोलणे होते का, असे अतिशय 'वैयक्तिक' प्रश्न देखील चव्हाट्यावर आणले जाऊ लागले.

गलिच्छ, दूषित राजकारणी हेतूने असे प्रश्न चव्हाट्यावर आणणाऱ्या त्या सर्वांना माझी एक कळकळीची विनंती आहे. "ती"च्या स्वातंत्र्यावर गदा आणू नका. एक परित्यक्ता म्हणून "ती"च्या हक्कासाठी गळे काढणार्यांनो, हे सरळसरळ "ती"च्या  मानवाधिकारांचे हनन आहे. एकटेपणात आणि कष्टात आयुष्य व्यतीत केलेल्या "ती"ची लक्तरे करून अशी चव्हाट्यावर टांगू नका. त्यातून तुमचे 'राजकारणी हित' साधेल की नाही माहित नाही, पण त्यात "ती" आणि "ती"चे कुटुंब मात्र पार उद्धस्त होईल. "ती"च्या पुढील आयुष्यासाठी एवढे करणे टाळा. कृपा होईल!


[ महत्त्वाचे:-
१) मुळात श्री. नरेंद्र मोदी आणि श्रीमती जशोदाबेन ह्यांचा विवाह ते दोघेही लहान (घटनेनुसार १८ वर्षाखालील मुलांना 'minor' म्हटले जाते) असताना झाला. त्यामुळे त्या विवाहाला कुठलाही कायदेशीर आधार नाही...
२)  तसेच श्री. नरेंद्र मोदी आणि श्रीमती जशोदाबेन लग्नानंतर फारच कमी काळ (केवळ ३ महिने) एकत्र राहिले. त्यामुळे असा विवाह कायद्याने सहजरित्या रद्दबातल ठरवला जाऊ शकतो... ]