14 April 2014

जशोदाबेन

सध्या सार्वत्रिक निवडणुकांचे दिवस सुरु आहेत. वृत्तवाहिन्यांचे कार्यक्रम आणि वृत्तपत्रांचे रकाने निवडणुकीच्या बातम्यांनी भरभरून येत आहेत. हल्ली काही राजकारण्यांनी राजकारणाची पातळी अतिशय खाली आणून ठेवली आहे. अशा राजकारण्यांनी सैनिकांच्या साहसाची गटबाजी केली, निघ्रूण बलात्काऱ्यांच्या बाजूने गळेही काढले. नेतेमंडळीना तर हल्ली एकमेकांवर अश्लाघ्य चिखलफेक करण्यातच धन्यता वाटत असते; आणि वृत्तवाहिन्यांना ही सगळी चिखलफेक परतपरत उगाळत बसण्यात! अशा परिस्थितीत संवेदनशील व्यक्ती काही भाष्य करूच शकत नाही. सुन्न होऊन बघत बसण्याशिवाय काही पर्याय उरत नाही.

तशीच सुन्न-शांत बसून होते. काही बोला-लिहायचीही इच्छा होत नव्हती. पण "ती"ची व्यथा ऐकली. आणि हा संयमाचा बांध फुटला. बोलावं, लिहावं अगदी आक्रस्ताळेपणाने ओरडावं वाटू लागलं. "ती"च्या बाजूने उभं राहावं, सर्वांसमोर जाऊन "ती"ची बाजू मांडवी, असं वाटू लागलं. 

तसं पाहता "ती" अगदी सामन्यांतलीच एक. खेडेगावात, गरीब घरात जन्मलेली. जुन्या वळणाच्या कुटुंबात वाढलेली. ७वी पर्यंत जेमतेम शिक्षण पार केलं, तेव्हाच वडिलांनी "ती"चं लग्न लावून दिलं. अगदी लग्न म्हणजे काय हे कळायच्या आधी "ती" सासरी नांदायला गेली सुद्धा. नवऱ्याशी काही जवळीक होण्याची शक्यताच नव्हती. कारण नवऱ्याच्या मनात राष्ट्रप्रेमाचेच वारे वाहत होते. भारतमातेच्या चरणी लीन होऊ इच्छिणाऱ्या 'त्या'च्या साठी लग्न, बंधन, पत्नी ह्या दुरापास्त गोष्टी होत्या. त्यात अडकून न पडता त्याने त्याचा मार्ग निवडला. तो निघून गेला, तो परत मागे वळून पाहण्यासाठी नाहीच.

जाताजाता "ती"ला एकच संदेश देऊन गेला, 'वडिलांकडे जाऊन तुझे राहिलेले शिक्षण पूर्ण कर'. "ती" देखील नवऱ्याने सांगितलेल्या मार्गाने जाऊ लागली. शिकली-सवरली. शाळेत लहान मुलांना शिकवू लागली. भावांच्या आश्रयाला राहिलेल्या "ती"ने परत दुसऱ्या लग्नाचा कधी विचारच केला नाही. शाळेतील मुलांच्या शिक्षणातच स्वतःला झोकून दिलं. रोज शाळेची नोकरी, दैनंदिन घरकाम, पूजापाठ यातच "ती"ने संपूर्ण आयुष्य व्यतीत केलं. संपूर्ण एकटेपणाचा प्रवास! आपला निघून गेलेला नवरा परत कधीही आपल्या जवळ येणार नाही, आपल्याशी कुठला संपर्कही करणार नाही, याची "ती"ला मनोमन कल्पना होती. "ती"ने तशी आशा देखील कधी बाळगली नाही.

"ती"चा नवरा कैक वर्ष संघ-प्रचारक म्हणून भारतभर फिरला. आतोनात श्रम केले. समाजाचे, राष्ट्राचे कल्याण करण्यासाठी झटला. पुढे राजकारणात सक्रिय झाला. एका मोठ्या राज्याचा मुख्यमंत्री झाला. आणि त्या राज्यात केलेल्या कल्याणकारी कार्यामुळे देशभर प्रसिद्धीस आला. आणि आता 'तो'च भारताचा पंतप्रधान होण्याच्या जवळ पोहोचला आहे.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे या संपूर्ण प्रवासात 'त्या'ला कधीही बायकोची आठवण आली नाही. पण 'त्या'ची उणीदुणी काढणाऱ्या 'त्या'च्या विरोधकांना मात्र "ती"ची आठवण आली. आणि मग "ती"च्या अस्तित्वाचा शोध घेण्याची कुत्सित चढाओढ विरोधक आणि वृत्तसंस्था यांच्यात लागली. 'त्या'ने "ती"ला कसे त्यागले, "ती"ची कशी अवहेलना झाली, "ती"ने कसे एकटेपणात, हलाखीत आयुष्य व्यतीत केले, अशा कथांना उधाण आले. एवढेच नाही, तर "ते" दोघे किती दिवस एकत्र राहिले, त्यांच्यातील संबंध कसे होते, त्यांच्यात शारीरिक संबंध प्रस्थापित झाले होते का, त्यांचे एकमेकांशी बोलणे होते का, असे अतिशय 'वैयक्तिक' प्रश्न देखील चव्हाट्यावर आणले जाऊ लागले.

गलिच्छ, दूषित राजकारणी हेतूने असे प्रश्न चव्हाट्यावर आणणाऱ्या त्या सर्वांना माझी एक कळकळीची विनंती आहे. "ती"च्या स्वातंत्र्यावर गदा आणू नका. एक परित्यक्ता म्हणून "ती"च्या हक्कासाठी गळे काढणार्यांनो, हे सरळसरळ "ती"च्या  मानवाधिकारांचे हनन आहे. एकटेपणात आणि कष्टात आयुष्य व्यतीत केलेल्या "ती"ची लक्तरे करून अशी चव्हाट्यावर टांगू नका. त्यातून तुमचे 'राजकारणी हित' साधेल की नाही माहित नाही, पण त्यात "ती" आणि "ती"चे कुटुंब मात्र पार उद्धस्त होईल. "ती"च्या पुढील आयुष्यासाठी एवढे करणे टाळा. कृपा होईल!


[ महत्त्वाचे:-
१) मुळात श्री. नरेंद्र मोदी आणि श्रीमती जशोदाबेन ह्यांचा विवाह ते दोघेही लहान (घटनेनुसार १८ वर्षाखालील मुलांना 'minor' म्हटले जाते) असताना झाला. त्यामुळे त्या विवाहाला कुठलाही कायदेशीर आधार नाही...
२)  तसेच श्री. नरेंद्र मोदी आणि श्रीमती जशोदाबेन लग्नानंतर फारच कमी काळ (केवळ ३ महिने) एकत्र राहिले. त्यामुळे असा विवाह कायद्याने सहजरित्या रद्दबातल ठरवला जाऊ शकतो... ]