Showing posts with label Society and Politics. Show all posts
Showing posts with label Society and Politics. Show all posts

17 May 2014

मोदींना महिलांचा पाठींबा का?



श्री. नरेंद्र मोदी लवकरच भारताच्या पंतप्रधानपदी विराजमान होणार आहेत. २०१४च्या लोकसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर आता पंतप्रधानपदाचा शपथविधी ही केवळ एक औपचारिकता आहे. ह्या निवडणुकीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे श्री. नरेंद्र मोदींना समाजातील सर्व घटकांतून निर्णायक पाठींबा मिळाला. युवकांनी ज्याप्रमाणे मोदींना उचलून धरले, त्याचप्रमाणे भारतीय महिलांनीही त्यांना मोठ्या प्रमाणात साथ दिली. महिलांना मोदींच्या नेतृत्वाचे आकर्षण का वाटले, याचे विश्लेषण मी ह्या लेखात करत आहे.

भारतीय महिलांविषयी नेहेमीच बोलले जाते की त्यांना राजकीय समज नाही. आपले पती सांगतील त्या उमेदवाराला त्या मत देतात. तसेच भारतीय महिला सोशिक असतात. सामाजिक समस्यांविरुद्ध आंदोलन करण्याऐवजी त्या समस्यांना अंगवळणी पाडून घेतात. येईल त्या परिस्थितीला शांतपणे तोंड देत राहतात. मात्र ह्या मताला ह्यापूर्वीही भारतीय महिलांनी अनेकदा खोटे ठरवले आहे. बदलाची आणि प्रगतीची आस धरणाऱ्या भारतीय महिला अनेकदा भारतीय राजकारणात निर्णायक ठरल्या आहेत. तसेच ह्यावेळी घडले.

मुळात महिलांचा राजकारणाशी खूप जवळचा संबंध असतो (कळत नकळत). त्यांचे रोजचे जीवन राजकारणाने प्रभावित होत असते. विजेचा तुटवडा, पाण्याचा अशुद्ध व अपुरा पुरवठा, अन्नधान्ये आणि भाज्यांच्या वाढत्या किमती, शौचालयांची अनुपस्थिती, सांडपाण्याचा दोषपूर्ण निचरा ह्या महिलांना थेट भिडणाऱ्या समस्या आहेत. तसेच भारतातील मुलींच्या शिक्षणाविषयी अनास्था, माता आणि मुलांच्या आरोग्याची हेळसांड, आणि महिलांसाठी घातक रुढींचा पगडा, ह्यामुळे महिला त्रस्त असतात. अशा परिस्थितीत महिलांनी स्थानीय ते राष्ट्रीय राजकारणात वाढता सहभाग घेणे त्यांच्याच हिताचे आहे, जेणेकरून त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यात त्यांचा मोठा वाटा असेल.

स्वातंत्र्यानंतरच्या काळात भारतीय महिला मोठ्या प्रमाणावर काँग्रेसच्या पाठी उभ्या राहिलेल्या दिसल्या आहेत. काँग्रेसची सर्वसामान्यांविषयीची धोरणे त्यांना आपलीशी वाटली. त्यातून आपला विकास होईल, असे त्यांना मनोमन वाटले. मात्र विकासाकडे डोळे लावून बसलेल्या भारतीय महिलांना काँग्रेसने तो विकास बहाल केलाच नाही. अशा हताश परिस्थितीतच त्यांना मोदींच्या रूपाने एक आश्वस्त दिलासा मिळाला.

मोदींचे विनयशील तरीही आश्वासक व्यक्तिमत्व, त्यांची समाजमनाची समज, देशाविषयी निष्ठा आणि सुधारणेची तळमळ ह्यामुळे भारतीय महिला मुळातच त्यांच्या नेतृत्वाकडे आकर्षित झाल्या. तसेच मोदींनी केलेला गुजरातचा कायापालट घरा-घरात दूरदर्शन, वर्तमानपत्र यातून पोहोचला. गुजरातमधील २४ तास वीज, कछच्या रणातही पाण्याचा मुबलक पुरवठा, महिलांच्या शिक्षणातील प्रगती, स्त्रीभ्रूण हत्येचा नायनाट, आरोग्यविषयक सुधारणा ह्यामुळे जग अवाक झाले. त्याने भारतातील इतर भागात राहणाऱ्या महिलांच्या मनात आशेचा किरण चमकला. असेच सुखी, समाधानी जीवन आपल्याला हवे असे त्यांना न वाटते तरच नवल! मोदींच्या भाषणांमधून त्यांनी महिला समस्यांना वाचा फोडली. महिला आरोग्य, शिक्षण आणि जीवनस्तर ह्यावर भरपूर भाष्य केले. समस्यांनी पिचलेल्या महिलांना नवीन स्वप्ने दाखवली. ह्यामुळे महिलांचा पाठींबा मोदींकडे वळला.

महिलांच्या मोदी पाठिंब्याला अजून २ कारणे महत्त्वाची ठरली. एक म्हणजे, निवडणुकीत महिला उमेदवारांना खूप प्रोत्साहन दिले गेले. अगदी स्मृती इराणी, उमा भारतींपासून प्रथम उमेदवार मीनाक्षी लेखी, पूनम महाजन, हीना गावित पर्यंत सर्वांनी प्रचारात भाग घेतला. त्यांच्या चेहेऱ्यांतून महिला सबलीकरणाचे प्रतिबिंब दिसले. दुसरे कारण म्हणजे, महिला सुरक्षेचा दिवसेंदिवस गंभीर झालेला प्रश्न. ह्या प्रश्नावर उपाय करण्यासाठी देशाला एका संवेदनशील तरीही सक्षम सरकारची गरज होती. ते दोन्ही गुण फक्त मोदींमध्येच दिसले.

काँग्रेसने मोदींची छबी मलिन करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला. त्यांच्या भूतकाळातील विवाहाची चर्चा, जशोदाबेनविषयी खोटे गळे काढणे, महिलेच्या हेरखोरीची अतिरंजित कहाणी, आणि एकंदरच मोदींची 'पुरुषप्रधान' छबी रंगवण्याचा खूप प्रयत्न झाला. डाव्यांनी आणि तथाकथित 'मानवाधिकार' वाल्यांनी तर कहरच केला. पण भारतीय महिला कुठल्याच टीकेने विचलित झाल्या नाहीत. त्यांनी मोदींना पाठींबा देण्याचा निर्णय पूर्णत्वाला नेला. प्रसंगी पतीच्या, घरच्यांच्या सल्ल्यांना डावलून त्यांनी मोदींना भरभरून मतदान केले.

आपले जीवनमान उंचावेल ह्या भाबड्या आशेने भारतीय महिला मोदींच्या मागे उभ्या राहिल्या. त्यांच्या आशेला भविष्यात मोदी कसे पूर्णत्वाला नेतात याविषयी आता उत्सुकता आहे.

14 April 2014

जशोदाबेन

सध्या सार्वत्रिक निवडणुकांचे दिवस सुरु आहेत. वृत्तवाहिन्यांचे कार्यक्रम आणि वृत्तपत्रांचे रकाने निवडणुकीच्या बातम्यांनी भरभरून येत आहेत. हल्ली काही राजकारण्यांनी राजकारणाची पातळी अतिशय खाली आणून ठेवली आहे. अशा राजकारण्यांनी सैनिकांच्या साहसाची गटबाजी केली, निघ्रूण बलात्काऱ्यांच्या बाजूने गळेही काढले. नेतेमंडळीना तर हल्ली एकमेकांवर अश्लाघ्य चिखलफेक करण्यातच धन्यता वाटत असते; आणि वृत्तवाहिन्यांना ही सगळी चिखलफेक परतपरत उगाळत बसण्यात! अशा परिस्थितीत संवेदनशील व्यक्ती काही भाष्य करूच शकत नाही. सुन्न होऊन बघत बसण्याशिवाय काही पर्याय उरत नाही.

तशीच सुन्न-शांत बसून होते. काही बोला-लिहायचीही इच्छा होत नव्हती. पण "ती"ची व्यथा ऐकली. आणि हा संयमाचा बांध फुटला. बोलावं, लिहावं अगदी आक्रस्ताळेपणाने ओरडावं वाटू लागलं. "ती"च्या बाजूने उभं राहावं, सर्वांसमोर जाऊन "ती"ची बाजू मांडवी, असं वाटू लागलं. 

तसं पाहता "ती" अगदी सामन्यांतलीच एक. खेडेगावात, गरीब घरात जन्मलेली. जुन्या वळणाच्या कुटुंबात वाढलेली. ७वी पर्यंत जेमतेम शिक्षण पार केलं, तेव्हाच वडिलांनी "ती"चं लग्न लावून दिलं. अगदी लग्न म्हणजे काय हे कळायच्या आधी "ती" सासरी नांदायला गेली सुद्धा. नवऱ्याशी काही जवळीक होण्याची शक्यताच नव्हती. कारण नवऱ्याच्या मनात राष्ट्रप्रेमाचेच वारे वाहत होते. भारतमातेच्या चरणी लीन होऊ इच्छिणाऱ्या 'त्या'च्या साठी लग्न, बंधन, पत्नी ह्या दुरापास्त गोष्टी होत्या. त्यात अडकून न पडता त्याने त्याचा मार्ग निवडला. तो निघून गेला, तो परत मागे वळून पाहण्यासाठी नाहीच.

जाताजाता "ती"ला एकच संदेश देऊन गेला, 'वडिलांकडे जाऊन तुझे राहिलेले शिक्षण पूर्ण कर'. "ती" देखील नवऱ्याने सांगितलेल्या मार्गाने जाऊ लागली. शिकली-सवरली. शाळेत लहान मुलांना शिकवू लागली. भावांच्या आश्रयाला राहिलेल्या "ती"ने परत दुसऱ्या लग्नाचा कधी विचारच केला नाही. शाळेतील मुलांच्या शिक्षणातच स्वतःला झोकून दिलं. रोज शाळेची नोकरी, दैनंदिन घरकाम, पूजापाठ यातच "ती"ने संपूर्ण आयुष्य व्यतीत केलं. संपूर्ण एकटेपणाचा प्रवास! आपला निघून गेलेला नवरा परत कधीही आपल्या जवळ येणार नाही, आपल्याशी कुठला संपर्कही करणार नाही, याची "ती"ला मनोमन कल्पना होती. "ती"ने तशी आशा देखील कधी बाळगली नाही.

"ती"चा नवरा कैक वर्ष संघ-प्रचारक म्हणून भारतभर फिरला. आतोनात श्रम केले. समाजाचे, राष्ट्राचे कल्याण करण्यासाठी झटला. पुढे राजकारणात सक्रिय झाला. एका मोठ्या राज्याचा मुख्यमंत्री झाला. आणि त्या राज्यात केलेल्या कल्याणकारी कार्यामुळे देशभर प्रसिद्धीस आला. आणि आता 'तो'च भारताचा पंतप्रधान होण्याच्या जवळ पोहोचला आहे.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे या संपूर्ण प्रवासात 'त्या'ला कधीही बायकोची आठवण आली नाही. पण 'त्या'ची उणीदुणी काढणाऱ्या 'त्या'च्या विरोधकांना मात्र "ती"ची आठवण आली. आणि मग "ती"च्या अस्तित्वाचा शोध घेण्याची कुत्सित चढाओढ विरोधक आणि वृत्तसंस्था यांच्यात लागली. 'त्या'ने "ती"ला कसे त्यागले, "ती"ची कशी अवहेलना झाली, "ती"ने कसे एकटेपणात, हलाखीत आयुष्य व्यतीत केले, अशा कथांना उधाण आले. एवढेच नाही, तर "ते" दोघे किती दिवस एकत्र राहिले, त्यांच्यातील संबंध कसे होते, त्यांच्यात शारीरिक संबंध प्रस्थापित झाले होते का, त्यांचे एकमेकांशी बोलणे होते का, असे अतिशय 'वैयक्तिक' प्रश्न देखील चव्हाट्यावर आणले जाऊ लागले.

गलिच्छ, दूषित राजकारणी हेतूने असे प्रश्न चव्हाट्यावर आणणाऱ्या त्या सर्वांना माझी एक कळकळीची विनंती आहे. "ती"च्या स्वातंत्र्यावर गदा आणू नका. एक परित्यक्ता म्हणून "ती"च्या हक्कासाठी गळे काढणार्यांनो, हे सरळसरळ "ती"च्या  मानवाधिकारांचे हनन आहे. एकटेपणात आणि कष्टात आयुष्य व्यतीत केलेल्या "ती"ची लक्तरे करून अशी चव्हाट्यावर टांगू नका. त्यातून तुमचे 'राजकारणी हित' साधेल की नाही माहित नाही, पण त्यात "ती" आणि "ती"चे कुटुंब मात्र पार उद्धस्त होईल. "ती"च्या पुढील आयुष्यासाठी एवढे करणे टाळा. कृपा होईल!


[ महत्त्वाचे:-
१) मुळात श्री. नरेंद्र मोदी आणि श्रीमती जशोदाबेन ह्यांचा विवाह ते दोघेही लहान (घटनेनुसार १८ वर्षाखालील मुलांना 'minor' म्हटले जाते) असताना झाला. त्यामुळे त्या विवाहाला कुठलाही कायदेशीर आधार नाही...
२)  तसेच श्री. नरेंद्र मोदी आणि श्रीमती जशोदाबेन लग्नानंतर फारच कमी काळ (केवळ ३ महिने) एकत्र राहिले. त्यामुळे असा विवाह कायद्याने सहजरित्या रद्दबातल ठरवला जाऊ शकतो... ]



30 May 2013

मुक्ताफळं


सध्या आपला समाज एका विचित्र परिस्थितीतून वाट काढत आहे. हल्लीच्या वृत्तपत्रांचे मजकूर वाचले, वा काही काळ वृत्तवाहिनी समोर बसले की मन उदासीन होऊन जाते. भ्रष्टाचाराने बरबटलेले हात घेऊनच जनतेसमोर अभिमानाने उभे राहणारे नेते आणि आपल्याच नाकर्तेपणावर निर्लज्जपणे पांघरून घालणारे राजकारणी व प्रशासक पाहिल्यावर शिसारी येते. एकमेकांवर चिखलफेक करण्यात ह्यांचे हात कुणीच धरू शकत नाहीत. ह्याशिवाय, जागोजागी-क्षणोक्षणी होत असलेले बलात्कार, महिलांवरील अत्याचार, अल्पवयीन मुलांवर होणारे अतिप्रसंग, हे सर्व वाचून मनाची अगदी लाही लाही होते.

अशा बिकट परिस्थितीत भारताला दिशा दाखवण्याची मोठी जबाबदारी जाते ती समकालीन वरिष्ठ नेते, वैज्ञानिक, धर्मगुरू, आणि चरित्र नायक ह्यांच्याकडे. मात्र आजमितीला असे 'युग-पुरुष' हाताच्या बोटावर मोजण्याएवढे राहिले आहेत. मग ते लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना मोलाचे मार्गदर्शन करणारे माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम असोत, भ्रष्टाचाराविरुद्ध जिद्दीने लढणारे श्री अण्णा हजारे असोत, आपल्या निर्भय लेखणीने अयोग्याची कानउघाडणी व योग्याची प्रशंसा करणारे गिरीश कुबेरांसारखे पत्रकार असोत. भ्रष्टाचार विरोधी आंदोलनात स्वतःचा खारीचा वाटा उचलणारे अभिनेते श्री विक्रम गोखले ह्यांचे कार्यदेखील कमी मोलाचे नाही. मात्र हे किरकोळ अपवाद वगळता इतरत्र 'आनंद'च दिसतो. 

गेल्या ४ दिवसांपासून 'idea exchange' ह्या मथळ्याखाली 'लोकसत्ता'चे रकाने नाटककार, अभिनेते श्री गिरीश कर्नाड ह्यांच्या मुक्ताफळांनी भरून येत आहेत. खरेतर गिरीश कर्नाड हे एक थोर व्यक्तिमत्त्व. त्यांच्या विचारी आणि वेगळ्या शैलीमुळे नाटक-चित्रपट क्षेत्रातच नाही, तर इतरत्रही त्यांचा आदर केला जातो. अशा परिस्थितीत कर्नाडांनी बोलताना थोडे तारतम्य बाळगून बोलायला हवे, हे त्यांना आपण सांगण्याची गरज नाही. मात्र प्रसिद्धीची हाव आणि तथाकथित 'बुद्धीजीवी' वर्गात समाविष्ट होण्याची धडपड ह्यामुळे आपण काय बोलतो, ह्याकडे त्यांचे लक्ष राहिले नसणार. 

गुजरात राज्यातील विकास प्रकल्पांची जाहिरात केल्याबद्दल त्यांनी अभिनेते श्री अमिताभ बच्चन ह्यांच्यावर शरसंधान केले अहे. अमिताभचे हे वागणे 'संतापजनक' असल्याची टीका त्यांनी केली आहे. (काही वर्षांपूर्वी माननीय नाटककार श्री विजय तेंडूलकर ह्यांनी देखील 'नरेंद्र मोदींना गोळी घालेन' असे भ्याड, बिनबुडाचे विधान केले होते. गिरीश कर्नाड हे देखील त्यांचेच मित्र!), अशाप्रकारचे विधान करताना कर्नाडांनी 'लोकशाही' व 'भाषण स्वतंत्र' ह्याचा पुरेपूर वापर केलेला आहे. मात्र ह्याच 'लोकशाही' पद्धतीने बहुमताने निवडून आलेले गुजरात सरकार मात्र त्यांच्यासाठी टीकेस पात्र आहे. एखाद्या राज्यात एक पुढारी प्रचंड बहुमताने तीनतीन वेळा निवडून येतो, आणि तरीही आपल्या सारखे तथाकथित 'बुद्धीजीवी'आणि 'लोकशाहीचे स्तुतिपाठक' त्याची निष्कारण अवहेलना करण्यात मागेपुढे पाहत नाहीत, ह्याचा अर्थ काय ?

तसेच, 'बाबरी मशीद प्रकरणातून झुंडशाहीला राजमान्यता' असेही एक विचित्र विधान केले आहे. बाबरी मशीद प्रकरणाला  झुंडशाही म्हणेपर्यंत ठीक आहे. पण त्याचा १९९६ आणि १९९८ मध्ये भा.ज.प. च्या सत्तेवर येण्याशी संबंध लावणे हे कुणाही विचारी माणसास न पटणारे आहे. 'बाबरी मशीद पडणारेच सत्तेवर आले' असे म्हणताना कर्नाडांनी भारतीय मतदारांचा घोर अपमान केलेला आहे.  असे सरकार जर 'बाबरी मशीद पडणारे' होते, तर प्रचंड बहुमताने सत्तेवर आलेच कसे? भा.ज.प. सरकारने १९९८ नंतर आपला कार्यकाल पूर्ण करून अनेक लोकोपयोगी कामे केली. अशा सरकारला व त्यातील नेत्यांना 'बाबरी मशीद पडणारे' म्हणण्याचा मूढपणा कर्नाडांनी केला आहे. 

असो. ही व अशी मुक्ताफळं अजून २-३ दिवस लोकसत्ता मधून छापून येत राहतील. कारण पेपरवाले काय किंवा channel वाले काय, त्यांना फक्त 'TRP' दिसत असतो. त्यात त्यांचा तरी काय दोष म्हणा! त्यांच्याबद्दल तर न बोलणेच अधिक युक्त.

ह्या लेखाचे मुख्य लक्ष आहे, ते म्हणजे अशाप्रकारे मुक्ताफळं  उधळणारे.. वरीलप्रमाणे वक्तव्य करणारे गिरीश कर्नाड, आपल्या ब्लॉगवर आपल्याच पक्षाबद्दल उलटसुलट लिहिणारे लालकृष्ण अडवाणी, बिनबुडाचे दिग्विजय सिंघ, सामान्य जनतेला 'गुराढोरांचा वर्ग' म्हणणारे शशी थरूर, आणि 'मुलींच्या चुकीमुळेच बलात्कार होतात' असे म्हणणारे आसाराम बापूं, सगळे एकाच माळेचे मणी! ह्यांच्या अशा मुक्ताफळांमुळे भारतीय जनतेची दिशाभूल होतेय, हे ह्यांच्या कधी लक्षात येणार???

15 January 2012

Pink does not have to be beautiful always..!!!


I read a very interesting article in ‘the Hindu’ last Sunday. It was titled as ‘Pink Stinks’. I happen to like pink colour, so much so that I could not stop myself from reading the full article right away. However, as I went on reading it, I realized that the fuss was not about the colour in itself, while it was about the ‘Pinkification’ of girls.

The ‘Pink Stinks’ is a campaign that targets the products, media and marketing that prescribe heavily stereotyped and limited roles to young girls. It was launched in UK by two sisters, Abi and Emma moore, who were alarmed by gender-segregated products in their homes. While Emma’s house was filled with her daughter’s ‘pink’ ‘girly’ products, that of Abi was full of ‘masculine’ toys of her son. This kicked off the ‘Pink Stinks’ campaign three years ago. According to most of the followers, this campaign was overdue, as the ‘Pinkification’ process had been like a ‘pretty- pleasant and polite imprisonment’.

They are absolutely right. The campaign was indeed overdue. The girl-boy segregation is done right from when the baby is born. They are given ‘gendered’ toys to play with, they are given the ‘gendered’ products to consume, and they are hammered with ‘gendered’ comments all the time. Everything they are surrounded by is heavily ‘gendered’. While girls are provided with everything ‘cute’ and ‘pretty’, boys get the ‘rash’ and ‘tough’. While girls are made to play with dolls, boys play with airplanes, submarines and robots. The celebrated justification in such circumstances is usually ‘she loves this doll so much’ or ‘he likes to fly fighter plains’, etc. However, the question here is that, how can a kid (aged 2-3 years) simply ‘love’ something without somebody making him/her love it.

When I was a kid, I used to love playing ‘Ghar Ghar’ or ‘Bhatukali’ with my friends (including both male and female friends). But, similarly, I liked playing games like ‘Teacher Teacher’ and ‘Chor-Police’. This is usually the case with both male and female kids. Every human being is the product of his surroundings. He likes the things which he grows up with. When the girls are given only dolls and ‘Ghar Ghar’ utensils, they are bound to have their long-lasting impact. These toys block the thought-process of girls, as everything that is pretty and weak is equated with femininity.

Nevertheless, in the modern times, when women are touching new heights, this ‘gendered’ segregation does not seem to be really relevant. The parents who want their daughters to become pilots, IAS officers, lawyers and so on, should not really go for only ‘pink’ ‘pretty’ toys for them..
.. as ‘Pinkification’ really stinks!!!

27 November 2011

बदलणारे नातेसंबंध: एक चिंतन..


हल्ली अनेक ठिकाणी एक चर्चा ऐकू येते.. 'बदलत्या काळात भारतीय कुटुंब-व्यवस्था ढासळू लागली आहे'.. वर्तमानपत्रे, वाद-विवाद, चर्चासत्रे.. ह्यामध्ये हा विषय सध्या गाजतो आहे..
काल माझ्या बाबांनी मला एक लिंक forward केली.. ज्येष्ठ समाजसुधारक श्रीमती अपर्णाताई रामतीर्थकर यांचे दापोलीतील एका कार्यक्रमात केलेले भाषण होते ते.. विषय वरीलप्रमाणेच होता.. रात्री वाजेपर्यंत मी ते ऐकून संपवले.. भाषण संपेपर्यंत माझ्या मनात एकुणच सध्याच्या समाजाबद्दल उदासीनता निर्माण झाली..!!
श्रीमती अपर्णा रामतीर्थकर यांच्या  मते, 'भारतीय कुटुंब-संस्थेचे गंडांतर अगदी नजीक येऊन ठेपले आहे.. आणि ह्या परिस्थितीत सुधारणा केली नाही.. तर आपली कुटुंब-व्यवस्था कायमची मोडून पडेल..'

मी समाज-व्यवस्थेचा जो थोडाफार अभ्यास केला आहे.. त्यावरून,, 'पाश्चिमात्य समाजाचा मुलभूत घटक 'व्यक्ती' असते.. मात्र पौव्रात्य समाजाचा मुलभूत घटक 'कुटुंब' असते..' आपल्या समाजात अनादी काळापासून कुटुंब-व्यवस्थेला महत्वाचे स्थान देण्यात आले आहे.. व्यक्तीचे आयुष्य पूर्णपणे 'कुटुंब-केंद्रित' असते.. ती आपले सर्व निर्णय कुटुंबाच्या साक्षीने (परवानगीने!) घेते.. स्वतःपुर्वी कुटुंबाचा विचार करते.. आणि कुटुंबाच्या सुखासाठी स्वतःचे सुख त्यजायला तयार असते..
अर्थात.. ह्या कुटुंब-व्यवस्थेमध्ये स्त्री पुरुष ह्यांच्या स्वतंत्र भूमिका नेमून दिलेल्या होत्या.. पुरुष हा मुख्यत्वेकरून अर्थार्जन करीत असे.. स्त्री घरातील व्यवहार (स्वैपाक, पूजा-अर्चा, मुलांचे संगोपन, इत्यादी) सांभाळत असे.. हे असे कैक वर्षे चालत आले.. अगदी विनासायास..!!

मात्र गेल्या काही वर्षात हे कौटुंबिक "श्रम-विभाजन" बदलू लागले आहे.. स्त्रिया घराबाहेर पडू लागल्या- शिक्षण घेऊ लागल्या.. विविध क्षेत्रात कार्य करू लागल्या.. अर्थार्जन करू लागल्या.. 'करियर' करू लागल्या.. परिणामतः, कुटुंब-व्यवस्थेला धक्का पोहोचणे साहजिकच होते.. स्त्रियांच्या बदलत्या भूमिका, त्यांचे दीर्घ काळ घराबाहेर राहणे, संसाराची- मुला-बाळांची हेळसांड.. हे सगळं घडणं हे ओघानेच आलं.. ह्या सगळ्या राम-रगाड्यात, सासू-सासऱ्यांच्या, नवऱ्याच्या, मुलांच्या, इतर नातेवाईकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात त्या कमी देखील पडू लागल्या.. मान्य.. सगळं मान्य..!!

पण, श्रीमती रामतीर्थकर यांनी आपल्या भाषणात ह्या परिस्थितीसाठी स्त्रियांना पूर्णपणे जबाबदार धरले आहे.. शिवाय, ह्या परिस्थितीला तोडगा म्हणून स्त्रियांना काही सल्लेही दिले आहेत.. त्यांच्या सर्व सल्ल्यांविषयी उहापोह करणे येथे शक्य नाही.. परंतु, त्यांच्या एकूण भाषणाचे सत्त्व 'बदलत्या काळामुळे स्त्रियांचा बदललेला दृष्टीकोन' हे आहे.. स्त्रियांचे शिक्षण, त्यामुळे वाढलेल्या अपेक्षा, घरातील कामाविषयीची उदासीनता, नवऱ्याशी सासू-सासर्यांशी उर्मटपणे वागणे, त्यांचा आदर राखणे.. ह्या परिस्थितीकडे त्या आपले लक्ष वेधतात.. सरतेशेवटी कुटुंब वाचवण्यासाठी 'स्त्रीने पडतं घ्यावं ', 'पुरुषाने आपला कुटुंबावरील धाक पुनर्स्थापित करावा'.. असं त्या सांगतात..

मला त्यांचं भाषण खूप आवडलं.. परखड भाषा, नेमके विचार मांडण्याची हातोटी, आणि अस्खलित वाक्चातुर्य.. सर्व आहे.. समाजाविषयीची कळकळ आहे, त्याच्या उन्नतीचा ध्यास.. त्याच्या सुधारणेची आस आणि त्यासाठी अखंड प्रवास करण्याची तयारी आहे.. आजपर्यंत ८२० कुटुंब त्यांनी पडता-पडता वाचवली आहेत.. ह्याबद्दल मला त्यांचा अतिशय आदर वाटतो.. 'नातेसंबंध जपणे; त्यांना न्याय देणे', हेच व्यक्तीचे परम-कर्तव्य आहे.. हे त्यांचे मतही मला मनोमन पटते..

पण.. श्रीमती अपर्णा रामतीर्थकर यांचा योग्य सन्मान करून..
माझ्या मनात आलेले काही विचार मांडत आहे..

) समाज हा गतिशील असतो.. ('प्रगतीशील' शब्द मुद्दामहून वापरत नाही.. कारण बदल हा नेहेमीच चांगलाच असतो, असे नाही!!!).. समाजात कालानुरूप बदल घडत असतात.. आणि हे बदल 'एकमार्गी' असतात.. अर्थात, एकदा झालेले बदल परत 'विपरीत' (reverse) होत नाहीत.. मग अशा परिस्थितीत समाज-सुधारणेसाठी 'प्रतिगामी' तोडगे कसे उपयोगी पडतील?? गेली ५० हून अधिक वर्षे घराबाहेर वावरलेल्या, शिकल्या-सवरलेल्या, 'करियरिस्ट' स्त्रिया.. आता अचानक घरात राहतील..??? स्वैपाक पाणी, मुलांचे संगोपन करण्यात समाधान मानतील?? नवऱ्यासमोर पडतं घेतील?? त्यांच्यावर त्यांच्या 'नवऱ्याचा धाक' पुनर्स्थापित होऊ शकेल?? मुळीच नाही..
एकदा बदललेला समाज परत मागे वळून पाहत नसतो.. हे शक्य नसतं आणि वांछनीय ही नसतं..

) कुटुंब-व्यवस्था टिकावी ह्यासाठी स्त्रीने पडतं घ्यावं (सासूने/ सुनेने/ भावजयीने/ नणंदेने.. कुणीही!!!.. पण स्त्रीने!!!) आणि पुरुषाने आपला धाक परत प्रस्थापित करावा.. असं त्या म्हणतात.. म्हणजे.. शतकानुशतकं जे चालत आलं.. तसंच परत व्हावं.. स्त्रियांनी पुरुषांना घाबरावं.. नवऱ्यासमोर 'आपल्याला काही कळत नाही' असं वागावं..
ह्या विचारांचा सरळसरळ अर्थ असा होतो.. "शतकानुशतकं जे चालत आलं, ते सर्व बरोबरच होतं.. त्यात बदलाची काहीच गरज नव्हती.. बदल अनाठायी झाला.." ह्यालाच 'status -quoist विचार' असं म्हटलं जातं.. पण समाजात कुठलाही बदल अनाठायी घडत नसतो.. प्रस्थापित संरचनेत काही त्रुटी असतात.. म्हणूनच समाज बदलाकडे सरकत असतो..
एवढ्या वर्षांची व्यवस्था जाचक होती, अन्याय्य होती.. असं १९व्या शतकातील समाजसुधारकांच मत झालं.. त्यामुळेच त्यांनी बदलांची आस धरली..

थोडक्यात.. बदल झाले आहेत.. आणि आता ते पुसून टाकता येणार नाहीत.. सामाजिक बदलांमध्ये 'U -turn ' घेता येणं शक्य नाही.. आणि तसा तो घेणं योग्यही नाही..  

) आता मी माझ्या तिसऱ्या.. आणि सगळ्यात महत्वाच्या मुद्द्याकडे येते.. आपल्याला कुटुंब-व्यवस्था  टिकवायची आहे.. समाज सुधारायचा आहे..
पण ह्या सुधारणे मागचा दृष्टीकोन थोडा वेगळा असेल तर???
म्हणजे.. बदललेल्या परिस्थितीत.., मुली शिकतात.. 'करियर' करतात.. त्यांची लग्न उशिरा होतात.. लग्नापूर्वी त्यांची स्वतःची अशी एक ओळख समाजात निर्माण झालेली असते.. त्यामुळे लग्नानंतर सासरच्या परिस्थितीशी जुळवून घेणे त्यांना जड जाते.. हे सगळे बदल आपण 'दिलेल्या गोष्टी' म्हणून स्वीकारले.. तर??? तसेही आता ह्यात फेर-बदल होणे अशक्यच आहे ना??? (आपल्यापैकी काहींची कितीही इच्छा असेल तरीही..!!!).. मग बदलांचा स्विकार का करू नये???
ह्या बदलांमुळे जुन्या कुटुंब-व्यवस्थेला धक्का बसला आहे.. हे देखील मान्य करूया..

पण, हे सगळे 'व्यवस्थेतील बदल' (अर्थात.. 'systemic problems '..) आहेत.. त्यांचे खापर केवळ स्त्रियांच्या स्वातंत्र्यावर फोडता.. स्त्रियांकडून (परत) आज्ञाधारकपणाची ( पुरुषांकडून धाकाची!!!) अपेक्षा करता.. हे प्रश्न सोडवता येणार नाहीत का..??? स्त्रियांच्या बदलत्या भूमिकेबरोबर कुटुंबातील इतर घटकांनीही आपल्या भूमिकांचा फेरविचार करायला हवा असं वाटत नाही का???
'सासूने सुनेकडे मुलीप्रमाणे पाहावे, सुनेने सासूकडे आईप्रमाणे..' असे जर आपण म्हणतो.. तर हा कौटुंबिक भूमिकांचा फेरविचारच नाही का?? नवऱ्याने बायकोला घरकामात मुलांच्या संगोपनात साथ दिली (केवळ धाक दाखवत बसता) तर काही बिघडले का??? मुलाच्या आईप्रमाणेच मुलीच्या आईने लेकरांच्या संसारात काही सल्ले दिले (आपल्या भाषेत 'ढवळाढवळ केली') तर त्यात कुणाला एवढा राग येण्यासारखे काय झाले??
अर्थात, ह्या बदलत्या परिस्थितीमध्ये सुनांच्या बेदरकार वागण्याचे समर्थन करणे.. हे मुळीच अपेक्षित नाही.. सासू-सासऱ्यांना आई-वडिलाप्रमाणे वागावण्यामध्ये त्यांच्या उतारवयात त्यांच्या तब्येतीची काळजी घेणे.. त्यांचे मायेने संगोपन करणे.. हे ओघाने आलेच..

'व्यवस्थेतील बदल' हा सर्व घटकांच्या सहाय्याने घडत असतो.. त्याला सर्व घटक सारखेच जबाबदार असतात.. त्याचे परिणामही सर्व घटकांवर सारखेच होत असतात.. त्यामुळे त्यासाठी स्त्रियांनाच पूर्णपणे जबाबदार मानून.. त्यांच्याकडूनच तडजोडीची अपेक्षा करून.. ढासळणारी कुटुंब-व्यवस्था तरणार नाही.. उलट, घटस्फोटांचे प्रमाण अधिक वाढत जाईल.. आणि कुटुंब-संस्था पुरती मोडून पडेल..

त्यामुळे कुटुंबातील सर्व घटकांनी बदलाचा स्विकार ( आदरही!!!) करून त्याप्रमाणे आपल्या भूमिकांचाही फेरविचार करावा.. हेच खऱ्या अर्थाने 'नातेसंबंधांना न्याय देणे' होईल..

(ता. . माझ्याकडे श्रीमती अपर्णाताई रामतीर्थकर यांचे हे संपूर्ण भाषण आहे.)